चळवळीचे वटवृक्षात रूपांतर झालेले पाहून आनंद वाटतो- डॉ. शंकर चव्हाण
डॉ. शंकर चव्हाण यांना प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे स्मृती पुरस्कार प्रदान
शेवगाव/अहिल्यानगर प्रतिनिधी:
शब्दगंध म्हणजे एक विचार असून कोणत्याही प्रकारचा भेदभाव अथवा वैचारिक मतभेद यामध्ये नसून आज चळवळीचे वटवृक्षात रूपांतर होत असताना पाहून आनंद वाटत आहे.प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे यांच्या नावाने मला स्मृती पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या सोबतच्या आठवणी दाटून येत आहेत,असे मत प्रा.डॉ शंकर चव्हाण यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने स्व. प्राचार्य एच. के. तथा हिराचंद ब्राह्मणे स्मृती पुरस्कार शेवगाव येथील डॉ.चव्हाण यांच्या निवासस्थानी त्यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
शेवगाव पं.स.चे माजी सभापती बापूसाहेब भोसले,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड.सुभाष लांडे पाटील, संस्थापक सुनील गोसावी. अध्यक्ष राजेंद्र उदागे, शाहीर भारत गाडेकर, हरिभाऊ नजन, विठ्ठल सोनवणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.डॉ.शंकर चव्हाण म्हणाले की, शेवगावच्या कर्मभूमीतून सुरू झालेली ही चळवळ, महाराष्ट्रातील अनेक जिल्हे व्यापून राहिली आहे, हे पाहून आनंद वाटतो. चळवळीतील सर्वच कार्यकर्ते लेखक, कवी, कलावंत,पत्रकार एक जुटीने शब्दगंध संमेलन यशस्वी करत असतात,यावर्षी संपतदादा बारस्कर यांच्या स्वागताध्यक्षतेखाली झालेले संमेलनही तसेच दिमागदार झालेले आहे. हे विविध वृत्तपत्रातील बातम्या व वेगवेगळ्या चॅनेलवरील वृत्तांत वरून दिसून येत आहे.
बापूसाहेब भोसले बोलतांना म्हणाले की डॉ. शंकर चव्हाण यांनी शब्दगंध परिषदेचे अध्यक्ष पदही भूसवलेले असून लेखक, कवी म्हणून ते सर्वत्र परिचित आहेत आणि म्हणूनच स्व. हिराचंद बामणे स्मृती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे.
अँड लांडे पाटील बोलतांना म्हणाले की, शेवगावच्या मातीत रुजलेले शब्दगंधचे बीज आज अनेकांना सामावून घेऊन मोठे होत आहे. सुरुवातीच्या काळात सोबत असलेले प्रा.डॉ.शंकर चव्हाण यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असे आहे.शेवगाव ची साहित्यिक चळवळ वाढवण्यासाठी त्यांनी मोलाची भर घातलेली आहे, म्हणूनच हा पुरस्कार त्यांना प्रदान करताना आनंद होत आहे.
यावेळी अध्यक्ष राजेंद्र उदागे, शाहीर भारत गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.शेवटी सुनिल गोसावी यांनी आभार मानले.