मिरी गटात आ.मोनिका राजळे यांचे वर्चस्व कमी तर आ.कर्डीलेंची पकड घट्ट?

वास्तव… (भाग १)

मिरी गटात आ.मोनिकाताई राजळे यांचे वर्चस्व कमी तर आ.कर्डीलेंची पकड घट्ट?

संपादकीय – वास्तव (भाग-१)
    येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांनी पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे.                          पाथर्डी तालुक्यातील एकूण सात जिल्हा परिषद गटांपैकी मिरी जिल्हा परिषद गट हा राजकीय दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण व संवेदनशील मानला जातो. कारण हा गट पूर्वीच्या पाथर्डी विधानसभा मतदारसंघांत समाविष्ट होता परंतु मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर तो राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहे.

     त्यामुळे पाथर्डी तालुक्याच्या पंचायत समिती,बाजार समिती,साखर कारखाना व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या दृष्टीने या भागाचा आ.मोनिका राजळे यांच्याशी सबंध येतो.तर विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने आ.कर्डिले यांचे देखील या भागावर विशेष लक्ष असते.
    परंतु असे असले तरी यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकालाचा अभ्यास केल्यास हा गट शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. शिवसेनेचे स्व.मोहनराव पालवे यांनी अनेक वर्षे या गटाचे प्रतिनिधित्व केले. परंतु २०१४ साली झालेल्या निवडणुकीत मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी करत मोहनराव पालवे यांचा पराभव केला होता.परंतु पुढे पुन्हा एकदा स्व.अनिल कराळे यांच्या रूपाने हा गट शिवसेनेच्याच ताब्यात आला.                                                                     त्यामुळं विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे आमदार झाल्यानंतर त्यांची मिरी-करंजी जिल्हा परिषद गटावरील पकड सैल झालेली दिसून आलेली आहे.तर याउलट आ.कर्डिले यांनी या भागात आपले वर्चस्व निर्माण करून हक्काचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते तयार केल्याचे चित्र आहे.कर्डिले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोठी ताकद देऊन या भागावर आपली पकड मजबूत केल्याचे स्पष्ट होत आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील आ.कर्डिले यांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने प्रचार करून आ.कर्डिले यांना या परिसरातून मोठे मताधिक्य मिळवून दिल्याचे निकालातून देखील अधोरेखित झालेले आहे. 

     दिवंगत माजी आमदार राजीव राजळे यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात मिरी व परिसरातील अनेक युवा कार्यकर्त्यांना राजकारणाचे धडे देऊन आपलेसे केले होते.त्यामुळं राजीव राजळे यांच्याशी या भागातील अनेकांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.त्याचाच परिपाक म्हणून स्व.राजीव राजळे हे स्वतः सुरवातीला काँग्रेस नंतर अपक्ष व शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणुकीत उतरलेले असताना देखील मिरी व करंजी परिसरातील कार्यकर्त्यांनी पक्ष न पाहता स्व.राजीव राजळे यांना विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत मोठी राजकीय ताकद दिल्याचा इतिहास आहे. परंतु स्व.राजीव राजळे यांना निवडणुकीत यश न आल्याने त्यांनी सरतेशेवटी पत्नी मोनिका राजळे यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांच्या हक्काच्या व विश्वासाच्या मिरी-करंजी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरवले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी देखील राजळे यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मोनिकाताई राजळे यांना निवडून आणले.पुढे मोनिकाताई राजळे यांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष होण्याची देखील संधी मिळाली होती.
     परंतु त्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजळे कुटुंबीयांनी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन भाजपामध्ये प्रवेश करून भाजपची अधिकृत उमेदवारी मिळवली.


      मोनिकाताई आमदार झाल्यानंतर काही कालावधी नंतर राजीव राजळे यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळं आ.मोनिका राजळे यांचे मिरी-करंजी गटाकडे काहीसे दुर्लक्ष होताना दिसून आले.त्यामुळे राजळे यांचे अनेक कार्यकर्ते त्यांच्या पासून काहीसे दुरावल्याची वस्तुस्थिती आहे.कारण याचे पडसाद जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मागील दोन निवडणुकांवर पडल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.मोनिका राजळे या २०१४ साली आमदार पदी विराजमान झाल्यानंतर मिरी-करंजी गटासाठी २०१५ साली पोटनिवडणूक घ्यावी लागली होती. या पोटनिवडणुकीमध्ये  आ.कर्डिले यांनी भाजपकडून वैभव खलाटे यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. त्यामुळे उमेदवारी देताना विचारत न घेतल्याने नाराज झालेले राजळे प्रचारातून काहीसे अलिप्त राहिले परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र शिवसेनेच्या दिवंगत मोहनराव पालवे यांच्या पत्नीला साथ दिल्याची चर्चा सर्वश्रुत होती.त्यावेळी मात्र मोहनराव पालवे यांच्या पत्नीला शिवसेनेच्याच बंडखोर उमेदवार व तत्कालीन शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिवंगत अनिलराव कराळे यांच्या पत्नी अनुराधा उर्फ उषाताई कराळे यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.त्यामुळं त्या निवडणुकीत पालवे यांच्या रूपाने आ.राजळेंचाच पराभव झाल्याचे बोलले गेले.
          त्यानंतर २०१७ साली झालेल्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी देशभर भाजपची लाट असल्याने तसेच पाथर्डी-शेवगाव च्या मोनिका राजळे व राहुरीचे शिवाजीराव कर्डिले हे दोन्ही आमदार देखील भाजपचेच असल्याने भाजपकडे उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह इतर पक्षांतील देखील अनेकांनी प्रयत्न केले. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना आ.कर्डिले व आ.राजळे यांना मोठी कसरत करावी लागली होती.परंतु पक्ष जरी एक असला तरी देखील आ.कर्डिले व आ.राजळे या दोन्ही आमदारांचे एकनिष्ठ व हक्काचे कार्यकर्ते वेगवेगळे आहेत.त्यामुळे दोन्ही आमदारांच्या समझोता एक्सप्रेस मध्ये झालेल्या फॉर्मुल्यानुसार जिल्हा परिषदेची उमेदवारी आ.राजळे यांच्या समर्थकाला तर मिरी व करंजी या दोन्ही गणाची उमेदवारी आ.कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांना देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे आ.राजळे यांनी त्यांचे जवळचे स्नेही व निष्ठावंत समजले जाणारे जवखडचे चारुदत्त वाघ यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली होती.तर कर्डिले यांनी मिरी मधून संतोष शिंदे व करंजी मधून गंगुबाई आटकर यांना उमेदवारी दिली होती.

      आ.राजळे यांनी मिरी गटाचे प्रतिनिधित्व केलेले असल्याने त्यांनी आ.कर्डिले यांच्या साथीने तत्कालीन पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांची सभा घेऊन चारुदत्त वाघ यांना निवडून आणण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती.परंतु तरी देखील त्याचा निकालावर काहीही परिणाम दिसून आला नाही व चारुदत्त वाघ यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या निवडणुकीत शिवसेनेचे अनिलराव कराळे व काँग्रेसचे मोहनराव पालवे यांच्यातच अटीतटीचा सामना होऊन अनिल कराळे विजय झाले तर राजळे समर्थक चारुदत्त वाघ यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.त्यामुळे आमदार राजळे यांच्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीतील हा दुसरा मोठा धक्का मानला गेला होता.याउलट आ.कर्डिले यांनी करंजी गणातील उमेदवार निवडून आणला तर मिरी गणातील उमेदवाराला पराभव स्विकारावा लागला.
     त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राहुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना मिळाली.त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते देखील अतिशय आत्मविश्वासाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज होते. परंतु ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. पर्यायाने मुदत संपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये प्रशासकराज सुरू झाले ते आजतागायत सुरूच आहे.त्यामुळे तनपुरे यांच्या कार्यकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ न शकल्याने तनपुरेंच्या कार्यकर्त्यांच्या पडली निराशाच पडली आहे.


       हा जरी इतिहास असला तरी देखील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आ.कर्डिले हे तनपुरेंना पराभूत करून पुन्हा एकदा आमदार पदी विराजमान झाले. या निवडणुकीत देखील आ.कर्डिले यांना मिरी गटातून पुन्हा एकदा मोठे मताधिक्य मिळाले असल्याने त्यांचा विजय अधिक सोयीस्कर झाल्याचे वास्तव आहे.
      मिरी गटावर ज्यांची पकड होती व ज्यांच्याशिवाय स्पर्धेत कुणी वाटत नसायचे असे दिवंगत मोहनराव पालवे व दिवंगत अनिलराव कराळे या दोन्ही नेत्यांचे दुर्दैवी निधन झाल्याने या गटाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी नवीन चेहऱ्याला मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे एकंदरीतच या सर्व बाबींचा विचार केल्यास आ.राजळे यांच्या तुलनेने आ.कर्डिले यांचा या भागावर अधिक प्रभाव असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालेले असल्याने आ.मोनिका राजळे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. व त्या अनुषंगाने आ.राजळे यांनी आ.शिवाजीराव कर्डिले यांच्याशी सल्ला मसलत करून आगामी निवडणुकीसाठी उमेदवारीचा फॉर्मुला बदलून जिल्हा परिषदेची उमेदवारी आमदार कर्डिले यांच्या समर्थकाला देण्याची भूमिका स्वीकारायला हवी. कारण मागील निवडणुकीप्रमाणे यावेळी देखील संपूर्ण भाजपचीच लाट असल्याने व दोन्ही आमदार भाजपचेच असल्याने सद्यस्थितीत एकंदरीत भाजपसाठी अच्छे दिन असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून आमदार राजळे आगामी काळात काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

क्रमशः…… (भाग २ लवकरच)
(लेखक ‘महाराष्ट्र ऑल इन वन’ चे मुख्य संपादक आहेत)
संपर्क: 8888770819 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें